कोल्हापूर : कोल्हापूरचा उपर्मद केल्याने कालपासून ट्रोल झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी आज एका व्हिडिओमार्फत खुलासा केला असून त्यात त्यांनी कोल्हापूरबाबत असे वाक्य आपण झोपेतही उच्चारु शकणार नाही, असे म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूरात पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूरमधील पराभवाचे विवेचन केले. त्यावेळी त्यांनी हा पवारांचा करिष्मा नाही तर बंडखोरांचा फटका असल्याचे म्हटले आहे. कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी एक व्हॉट्सअप मेसेज वाचून दाखवला. त्यात भाजपाने गेल्या ५ वर्षात केलेल्या कामाची यादी होती. सगळं जग सुधारेल, पण कोल्हापूर सुधारणार नाही़ या वाक्याने मेसेजचा शेवट झाला. या शेवटच्या वाक्यामुळे पाटील सोशल मिडियावर काल दिवसभर ट्रोल झाले.

त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सकाळी एका व्हिडिओमार्फत पत्रकार परिषदेतल्या व्हॉट्स अप मेसेज आणि त्यातल्या शेवटच्या ओळीबद्दल स्पष्टीकरण दिले. गेल्या ५ वर्षात काय करायचे राहिले हे आम्ही जनतेला विचारले आहे. मी व्हॉट्स अप मेसेज पत्रकार परिषदेत वाचून दाखवला. टोल
आम्ही घालवला.

विमानतळ सुरु केले. या मेसेजमधील सकारात्मक मुद्दे मांडले. त्या मेसेजच्या शेवटी जे वाक्य होत. त्या वाक्याशी मी सहमत नाही. कोल्हापूरच्या जनतेच्या मनात माझ्याबद्दल विश्वास आहे. शेवटच्या वाक्यावरुन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विरोधकांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. कोल्हापूरच्या जनतेचा उपमर्द करणारे वाक्य मी झोपेतसुद्धा उच्चारु शकणार नाही, असे त्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.