मुंबई : राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना राज्यसरकार माफक स्वरुपातली परवानगी देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी सांगितले.
ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात आहे. तर ग्रीन झोननमधील जिल्ह्यांत कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. अशा जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना राज्य सरकार परवानगी देणार आहे. यासाठी आवश्यक असलेला सर्व कच्चा माल पोहचवण्याची जबाबदारी सरकार घेईल, मात्र कामगारांची सोय ही मालकांनाच करावी लागेल असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात करोनामुळे सर्व जनजीवन ठप्प झालं आहे. राज्यात लॉकडाउन लागू होईल सहा आठवडे लोटले असून, त्यानंतर राज्यातील परिस्थितीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आज संबोधित केले
उद्यापासून काही भागातील लॉकडाऊनच्या अटी शिथील होणार असल्या तरी या काळात जिल्ह्यांच्या वेशी या बंदच राहणार असल्यामुळे नागरिकांना या काळात बाहेर पडता येणार नाही असंही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी राज्यातील सर्व डॉक्टरांचेही उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. नागरिकांना या काळात ताप-सर्दी-खोकला असा कोणताही आजार असेल तर लगेच तपासणी करुन घ्यावी असं आवाहन सरकारने केलं आहे. या काळात खासगी डॉक्टरांचे दवाखानेही सुरुच असतील. याचसोबत केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या तांदळाव्यतिरीक्त राज्याने गहू आणि डाळीचीही मागणी केल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
संपूर्ण जगाची अवस्था सरणार कधी रण. या गीतासारखी झाली आहे. हा शत्रू आपल्याच लोकांच्या माध्यमातून आपल्यावर हल्ला करतोय. पण, यात आपण एक पराक्रम केला आहे. तो म्हणजे संयम. उद्या या संयमाला सहा आठवडे पूर्ण होतील. मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतोय की, करोनासदृश्य लक्षणं आढळली तर तातडीनं रुग्णालयात जा, असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं. लॉकडाउनमुळे कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी झाल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. पण, मृतांचा आकडा ही चिंतेची बाब आहे. यात मला प्रामुख्यानं सांगायचं की, वाढत्या मृत्यदराचं कारणही दिसून आलं आहे. कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर नागरिक त्याकडं दुर्लक्ष करत आहेत. मात्र, सगळ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की, कोरोनाची तपासणी केल्यानंतर चाचणी रिपोर्ट यायला वेळ लागतो. त्यामुळे उशिरानं रुग्णालयात आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की, सर्दी, खोकला, ताप अशी करोना सदृश्य लक्षणं दिसून आली की तातडीनं रुग्णालयात जावं. तुम्ही लवकर रुग्णालयात आलात, तर बर होऊनच घरी जाल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी लोकांना दिला.
